हिंदुत्वात काय त्रुटी आहेत

जे धर्माचं रक्षण करतात, त्यांचं रक्षण धर्म करतो

This article has been translated from English into Marathi by Manohar Railkar

हिंदुत्वाच्या एकूण घटनेतच काही तरी  त्रुटी म्हणा, किंवा उणीवा असाव्यात, असं मला कैकदा वाटतं. कारण, ख्रिश्चनता आणि इस्लाम ह्यांना जशी जगभर मान्यता आणि सन्मान मिळाले त्याप्रमाणं हिंदुत्वाला मिळाले नाही, हे स्पष्ट आहे. माध्यमांवर, पाठ्यपुस्तकांतून भारतांतर्गत, तद्वतच जगभरात हिंदुत्वाला उचित प्रकारची मान्यता मिळावी म्हणून हिंदू झगडत असतात.

पण, मला मात्र, ह्याचा अर्थ लागू शकत नाही. वास्तविक, हिंदुत्वाला मुळातच धीरगंभीर सखोल तत्त्वज्ञानाचा भक्कम आधार आहे, आणि विशेष महत्त्वाची आणि नवलाची बाब म्हणजे ते तत्त्वज्ञान आधुनिक काळातल्या अणु-विज्ञानाशीही मिळतंजुळतं आहे! “मी सांप्रदायिक नाही. पण आध्यात्मिक विचारांचा नक्की आहे,” अशी भूमिका घेणाऱ्यांचा गट पश्चिमेकडे आजकाल वाढू लागला आहे.

ख्रिश्चनांची आणि मुस्लीमांची भारतावर एके काळी सत्ता होती. त्यामुळं त्यांच्या संप्रदायांना सन्मान मिळत जाणं आणि हिंदुधर्माला मागास ठरवून त्याची उपेक्षा केली जाणं समजण्यासारखं होतं. पण आजच्या जगात सर्वत्र खुला कारभार असताना हिंदुधर्माशी उपेक्षेचं आणि अन्यायपूर्ण वर्तन होण्याचं काय कारण आहे? आणि वस्तुतः तो तर सर्वांत आदरणीय धर्म असताना? ही अवस्था कशी बदलता येईल?

हिंदुत्वातच कुठं खोट आहे आणि ती कशी दूर करता येईल, ते अचानक एक दिवस माझ्या ध्यानात आलं. अंतिमतः हिंदुत्वालासुद्धा ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मांच्या बरोबरीचं स्थान मिळेलच.

अगदी साधी युक्ती आहे. आपण अशी एक कल्पना करू:

प्राचीन ऋषिमुनींनी आपल्या प्रदीर्घ चिंतनातून एक महत्त्वाचं वाक्य प्रतिपादलं आहे. कारण एखादा संप्रदाय एकीकडे आदरणीय, सामर्थ्यशाली ठरतो आणि त्याला सातत्यानं अनुयायी मिळतात, तर दुसऱ्या एकाचे अनुयायी घटत जातात, त्याची टिंगलटवाळी होते. आणि हे अंतर केवळ त्या एकाच वाक्यामुळं पडतं कोणतं वाक्य?

“जर मी काय सांगतो, त्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाहीत, तर ती महान शक्ती अंतिमतः तुम्हाला नरकाग्नीत टाकील.” वेदांची निर्मिती करून झाल्यावर महर्षी व्यासांनी पुढील वाक्य लिहिलं, “केवळ वेदांनीच जे काय सांगितलं तेच सत्य आहे, हे कुणी मान्य केलं नाही, तर स्वतः ब्रह्मतत्त्वच त्यांना नरकाग्नीत फेकून देईल.” किंवा महाभारताची रचना करून झाल्यावर शेवटी, असं लिहिलं, “ब्रह्म आणि मनुष्य ह्यांच्यांत केवळ कृष्णच मध्यस्थ असू शकतो. त्याच्यावर ज्यांचा विश्वास नसेल ते अखेरीस नरकाग्नीत सतत जळत राहतील.”

किंवा गुरु वसिष्ठांचा उपदेश सांगून झाल्यावर वाल्मीकींनी पुढलप्रमाणं प्रतिपादन केलं, “केवळ वसिष्ठच खरे गुरु असून त्यांच्या उपदेशावर विश्वास नसलेल्यांना नरकाग्नीत सतत जळत राहावं लागेल.”

असं असतं तर हिंदुत्वाचा इतका उपहास झाला नसता आणि तोही इतर संप्रदायांप्रमाणं एक सन्मान्य संप्रदाय म्हणून मान्यता पावला असता. पण मग, हिंदुधर्म सहस्रावधी वर्षं आधीपासूनच जगात असल्यामुळं इतर नवीन संप्रदायांना डोकं वर काढायची आणि आपलाच संप्रदाय सत्य असून इतर सर्व नष्ट झाले पाहिजेत, असं सांगायची संधीही मिळाली नसती.

तरी सगळं काही संपलंय असं नव्हे. जीझस आणि महमद ह्यांच्या मृत्यूनंतर बायबल आणि कुराण लिहिले गेले. आणि आधीच्या कैक आवृत्या नष्ट केल्या गेल्या. त्यामुळं त्या ग्रंथांत हिंदूही सुधारणा करू शकले असते नाही का?.

पण, ते सार संदिग्ध आहे आणि अर्थात, मीही फारसं गंभीरपणं बोलत नाही.

मात्र, एक दिवस माझ्या एक लक्षात आलं. ह्या पोथीनिष्ठ संप्रदायांना मिळालेली मान्यता तर्कदुष्ट प्रतिपादनांवर आधारित आहे. त्यामुळं हिंदूंच्या मनात आलं असतं तर तसाच तर्कदुष्टपणा करून त्यांच्यांत सुधारणा करणं हिंदूंना तर सहज जमलं असतं, कारण तोच महत्त्वाचा भाग आहे. “आम्हीच एकटे सत्य” असून त्याच्या विरुद्ध असणारे इतर सारे आगीत जळणार आहेत, ही भूमिका घेणं त्यांनाही अशक्य नव्हतं.

खरं म्हणजे त्यात तर्कदुष्टतेपेक्षाही कुटिलतेचा भागच अधिक आहे. कारण, ज्यांनी ती नरकाग्नीची कल्पना मांडली, त्यांचाही त्या कल्पनेवर विश्वास नसावा हाच संभव आहे. ते तत्त्व त्या सर्वशक्तिमान ईश्वराचं नव्हेच. जगात मोठेपणा मिळण्याचा तो त्यांचा एक कुटिल डाव आहे.

उलट पक्षी, ऋषीच कितीतरी प्रांजल होते. त्यांचं वर्तन तर्कदुष्ट किंवा कुटिलही नव्हतं. वास्तविक त्याचा भारतीयांना, अगदी सर्वच भारतीयांना अभिमान वाटावा, अशीच अवस्था आहे..

मात्र, केवळ अभिमान पुरेसा नाही. आजच्या भारतीयांनी ही कुटिलता ओळखायला हवी आणि त्या संप्रदायांना आपल्यावर मात करू देऊ नये. त्यामुळं आपला घात होऊ शकेल. अशा उदाहरणांची वाणही नाही.

जे धर्माचं रक्षण करतात, त्यांचं रक्षण धर्म करतो (धर्मो रक्षति रक्षतः). म्हणून अधार्मिक शक्तींना आव्हान दिलं पाहिजे.

जगाच्या रंगभूमीवर महाभारतसदृश युद्ध सततच चालू असावं असं दिसतं. पण, दैवी आणि दानवी ह्या भेदांच्याही पलीकडे वरच्या पातळीवर युद्ध चालूच असावं, असं वाटतं. पण सर्व काही ब्रह्मातून प्रकट झालं असून अंती त्याच्यातच विलीन होईल.

कोट्यवधी मनुष्यप्राणी अशा नरकाग्नीत जळून जातील असं मानणं अशक्य आहे. हा ख्रिश्चन आणि मुस्लीमांचा दावा निरर्थक आहे. त्याला भाव देण्याचं कारणच नाही, त्याचा धिक्कारच करायला हवा.

Disclaimer: The facts and opinions expressed within this article are the personal opinions of the author. IndiaFacts does not assume any responsibility or liability for the accuracy, completeness, suitability, or validity of any information in this article.